पुणे: दुसऱ्या कसोटीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-०ने आघाडी घेतली आणि ही मालिका सहज खिशात घातली. कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक (२५४ धावा), सलामीवीर मयांक अग्रवालचं शतक (१०८ धावा) तसेच रविंद्र जाडेजा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची परवा ३ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने पाहुण्या संघाला चौथा धक्का दिला. त्याने एनरिक नोर्टजेला कोहलीकरवी झेलबाद करत माघारी धाडले आणि पाहुण्यांची अवस्था ४ बाद ४१ अशी झाली. त्यानंतर ५३ धावसंख्या असताना थेयुनिस ब्रूयनला झेलबाद करत उमेश यादवने दक्षिण आफ्रिकेचा पाचवा बळी टिपला. पुढे कर्णधार फाफ डुप्लेसी आणि क्विंटन डीकॉक जोडीने धावसंख्या शंभरपार नेली. मात्र धावसंख्या १२८ असताना डीकॉकचा अडसर अश्विनने दूर केला. उपहारावेळी कर्णधार फाफ डुप्लेसी ५२ धावा करून नाबाद होता. उपहारानंतरचा खेळ सुरू झाला आणि भारताने पाहुण्यांना लागोपाठ दोन धक्के दिले. आधी सेनुरन मुत्तुसामी आणि नंतर कर्णधार डुप्लेसी बाद झाला. डुप्लेसी बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ८ बाद १६२ अशी होती. त्यानंतर पुढच्या दोन विकेट झटपट मिळवून पाहुण्या संघावरील दडपण वाढवण्याची भारताची योजना होती मात्र तळाला फिलेंडर आणि महाराज यांनी चिवट खेळी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. केशव महाराजने आपले पहिले अर्धशतक झळकावले तर फिलेंडरने नाबाद ४४ धावांची खेळी केली. दोघांनी नवव्या विकेटसाठी शतकी भागिदारी रचली. दोघांनी सामन्याच्या तिसऱ्या सत्रात आपलं वर्चस्व राखलं. महाराजला अश्विनने माघारी धाडल्यानंतर रबाडाही पाठोपाठ बाद झाला आणि पाहुण्यांचा डाव २७५ धावांवर आटोपला. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन मिळाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आणखी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात १८९ धावांवरच गुंडाळले. त्यांच्या एल्गारनं सर्वाधिक ४८ धावा केल्या. भारताकडून उमेश यादव आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर अश्विननं दोघांना तंबूत धाडले.
https://ift.tt/2B6mRD1