मुंबईः स्मार्टफोनमध्ये स्फोट होणे किंवा मोबाइलला आग लागणे यासारख्या घटना आता नवीन राहिल्या नाहीत. अशा घटना टाळण्यासाठी कंपन्यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसीत केले आहे. परंतु, तरीही या घटना कमी होताना दिसत नाहीत. मुंबईत अशीच एक घटना समोर आली आहे. शाओमीच्या नवीन फोनला एका महिन्यातच अचानक आग लागली असून कंपनीने मात्र हात वर केले आहेत. मुंबईत ही घटना उघडकीस आली असून शाओमीच्या रेडमी नोट ७ एस या स्मार्टफोनला अचानक आग लागली. या आगीत हा फोन पूर्णपणे जळाला आहे. या फोनचे जळालेले फोटो ग्राहकाने फेसबुकवर शेअर केले आहेत. मुंबईत राहणाऱ्या इश्वर चव्हाण याने हे फोटो फेसबुकवर अपलोड करून घडलेली घटना सांगितली आहे. इश्वर चव्हाणने १ ऑक्टोबर रोजी फ्लिपकार्टवरून रेडमी नोट ७ एस Redmi Note 7S हा फोन ऑनलाइन खरेदी केला होता. महिनाभर हा फोन चांगला चालला. परंतु, २ नोव्हेंबर रोजी हा फोन टेबलावर ठेवला होता. व तो ऑफिसमध्ये काम करीत होता. त्याचवेळी अचानक चव्हाणला काहीतरी जळाल्याचा वास आला. टेबलावर पाहिल्यानंतर फोन जळत असल्याचे त्याला दिसले. त्यातून धूर निघत होता, असे इश्वर चव्हाणने फेसबुकवर सांगितले. फोनला आग लागली त्यावेळी फोन चार्जिंगला लावला नव्हता असा दावाही इश्वर चव्हाणने केला आहे. खरेदी केल्यानंतर फोन माझ्याकडून कधीच पडला नाही, असेही त्याने सांगितले. फोनला अचानक आग लागल्याने फोनमधील सीमकार्ड काढणेही त्याला शक्य झाले नाही, असे त्याने सांगितले. या घटनेनंतर त्याने ठाण्यातील शाओमीच्या अधिकृत स्टोरकडे याची तक्रार दाखल केली. शाओमीने पाच दिवसांपर्यंत याचा तपास केला. त्यानंतर सांगितले की, फोनच्या बॅटरीत काहीच तांत्रिक बिघाड नाही. कंपनीने हात वर केल्याने इश्वर चव्हाणने तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपनीसाठी उत्पादनाची क्वालिटी सर्वात महत्त्वाची आहे. एमआयच्या ग्राहकांनी गेल्या पाच वर्षात आमच्यावर जे प्रेम दाखवले आहे. तसेच जो विश्वास टाकला आहे. तो खरोखरच आनंददायी आहे. आम्हाला अभिमान आहे की आमच्याकडे सर्वात मोठे सेल्स नेटवर्क आहे. ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यास आमचे नेहमीच प्राधान्य असते. हा फोन बाहेरून आदळला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याला कंपनी जबाबदार नाही तर ही ग्राहकाची चूक आहे, असे कंपनीने म्हटले आहे.