औरंगाबाद: औरंगाबादमध्ये काल ४० नवे करोनाबाधित सापडल्यानंतर आज पुन्हा १७ नवे करोनाबाधित सापडल्याने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २७३वर पोहोचली आहे. औरंगाबादमध्ये सकाळी ८ वाजेपर्यंत आणखी १७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २७३ झाली आहे. त्याचवेळी औरंगाबादमध्ये आतापर्यंत ९ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर २४ करोनाबाधित हे करोनामुक्त झाले आहेत. शहरात गेल्या सोमवारपासून चाचण्यांचे प्रमाण वाढण्याबरोबरच बाधित झपाट्याने आढळून येत आहेत. तसेच दररोज नवनवीन भागांमध्ये बाधित आढळून येत असल्याने करोनाचा विस्तार सर्वत्र दिसून येत आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभरात ४० करोनाबाधित आढळून आले. त्यानंतर रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत आणखी १७ बाधित आढळून आले. यातील १६ रुग्ण मुकुंदवाडी परिसरातील आहेत, तर बायजीपुरा येथील एक जण आहे. त्यामुळे आता मुकुंदवाडी परिसरातील संजयनगर, रोहिदास नगर, जयभीमनगर आदी भागांमध्ये सुमारे ७० करोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, मुकुंदवाडीतील करोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाची जराही लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना स्वत:हून पुढे येऊन उपचार करून घ्यावेत असं आवाहनही करण्यात येत आहेत.