'दिल्लीत देशभक्त सरकार असताना हे घडणं चांगलं नाही' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 5, 2020

'दिल्लीत देशभक्त सरकार असताना हे घडणं चांगलं नाही'

https://ift.tt/2W3eymB
मुंबई: पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात काश्मीरमध्ये एका कर्नलसह पाच जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. 'करोनाशी युद्ध व त्यातील योद्ध्यांना मानवंदना सुरूच राहील. पण काश्मीरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आमच्या भूमीवर आमचे जवान मारले जातात. ‘जय हिंद’चा नारा घशातच गुदमरून टाकणारे हे दृश्य आहे. दिल्लीमध्ये एक मजबूत आणि प्रखर राष्ट्रवादी देशभक्त सरकार असताना असं होणं हे चागलं लक्षण नाही,' असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर रविवारी भारतीय लष्करानं पुष्पवृष्टी केली. पंतप्रधान मोदी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. देशात हे सर्व होत असताना काश्मीरमध्ये पाकिस्तानी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यावरून शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर खोचक शब्दांत टीका केली आहे. 'पंतप्रधान मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांचे कर्तव्य बजावले आहे. पण श्रद्धांजल्या वाहून आणि उसासे सोडून काय होणार? या सर्व शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा. त्यांना मानवंदना देण्यासाठीही बॅण्ड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा. या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या,' अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. 'कर्नल शर्मा यांचे बलिदान हे साधे नाही. शर्मा हे २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांच्याबरोबर पाच बटालियनचे मेजर अनुज सूद, नायक राजेश व लान्स नायक दिनेशही मारले गेले आहेत. हिंदुस्थानी सैन्याने ५ वर्षानंतर दुसर्‍यांदा दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत कमांडिंग ऑफिसर गमावला आहे, अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे. 'काश्मीरमध्ये शहीद झालेल्यांमध्ये सबइन्स्पेक्टर एस. ए. काझी यांचाही समावेश आहे. त्यावरूनही शिवसेनेनं टोला हाणला आहे. 'सध्या देशात जे लोक हिंदू-मुसलमान असा राजकीय खेळ करीत आहेत, त्यांनी कर्नल शर्मा यांच्या खांद्यास खांदा लावून हौतात्म्य पत्करलेल्या काझी यांचे बलिदान विसरू नये,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.