मुंबई: 'सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणार्या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. सध्या भाजपमध्ये असलेले हे त्याच तडफडणार्या माशांचे प्रतिनिधी आहेत. झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतून ते टाळूवरचे केस उपटत असतील. एकवेळ करोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे,' अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे. ( Criticises ) महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या कथित नाराजीवरून सध्या हे विखे-पाटलांच्या निशाण्यावर आहेत. 'मातोश्री' निवासस्थानी गेल्याबद्दल विखेंनी थोरातांना लाचार म्हणून हिणवले आहे. थोरातांनीही विखेंना जशास तसं उत्तर दिलं आहे. या दोघांच्या वादात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून विखे-पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण हे काही मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर आपले समाधान झाल्याचा खुलासा थोरात यांनी केला. महाविकास आघाडी स्थिर व मजबूत असल्याची ग्वाही दिली. यावर विखे-पाटलांच्या पोटात खळबळ माजण्याचे कारण काय?, असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. 'नगर जिल्ह्याच्या राजकारणातील विखेंचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत, हीच विखेंची मूळ पोटदुखी आहे,' असं 'निदान'ही शिवसेनेनं केलं आहे. ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्यांना अग्रलेखातून 'बाटगे' आणि 'पावट्यां'ची उपमा देण्यात आली आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते, असा बोचरा टोला शिवसेनेनं हाणला आहे. विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात. विखेंचे आजचे वैभव व साम्राज्य ही काँग्रेसची देणगी आहे. नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या खाटेवर ते व त्यांचे घराणेच आतापर्यंत पाय लांब करून बसले होते, पण एक दिवस विखे सहकुटुंब शिवसेनेत आले. राज्यात व केंद्रात मंत्रिपदे भोगली व नंतर पुन्हा काँग्रेस पक्षात जाऊन सत्ताधारी झाले. काँग्रेसकडून सत्तापद भोगले व २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ते फडणवीसवासी झाले. सध्याच्या कुटील राजकारणात यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नाही. पण स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पाहायचे वाकून या विकृतीने तरी कळस गाठू नये. संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असते. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले. विखे-पाटील हे तर विरोधी पक्षनेते असतानाच भाजपमध्ये विलीन झाले. अशी हिंमत (लाचारी नव्हे!) अंगात भिनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थोरात वगैरे मंडळींचे कष्ट त्या दिशेने तोकडे पडले इतकेच म्हणावे लागेल. पक्ष संकटात असताना ज्यांनी उंदरांप्रमाणे उड्या मारल्या नाहीत व बुडते जहाज वाचवण्याचे प्रयत्न केले अशांना इतिहासाच्या पानावर स्थान मिळते. अशा एखाद्या पानावर विखे-पाटील कोठे आहेत काय? विखे-पाटलांनी काँग्रेसचा त्याग केल्याने काँग्रेसचे नुकसान झाले नाही व भाजपमध्ये गेल्याने भाजपचा दीडकीचा फायदा झाला नाही. विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांटउडीचे डोंबारी राजकारण प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे-पाटील यांनी भाजपवर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत हे त्यांनीच एकदा आठवून पाहावे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली असूनही त्यांची टुरटुर सुरू आहे.