मुंबई: सीमेवर चीनी सैन्याबरोबर झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले. चीनच्या या कुरापतीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री यांनी केंद्रातील सरकारवर टीका केली आहे. चीनच्या राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत झोपाळ्यावर बसणं बस्स झालं. आता चीनला लाल आँखे दाखवा, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून हा संताप व्यक्त केला आहे. चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे 'लाल आँखे' करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता?, असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी यापूर्वीही चीनच्या भारतीय सीमेतील घुसखोरीवरून मोदी सरकारला डिवचले होते. पाकिस्तानला आपण धडा शिकवतो, मग चीनला का नाही? असा सवालही त्यांनी मोदी सरकारला केला होता. आता त्यांच्या या नव्या ट्विटला भाजप काय उत्तर देते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. काल लडाख येथे गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी २० भारतीय जवान शहीद झाले तर एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार चीनचे ४३ सैनिकही जखमी झाले आहेत. ६ जून रोजी झालेल्या करारानुसार गलवान खोऱ्यातून सैनिकांना माघारी बोलावण्याची प्रक्रिया सुरू होती. भारतीय सैन्याची एक तुकडी जेव्हा नियंत्रण रेषेवरील चीनच्या सैन्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पोहोचले तेव्हा दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली आणि त्यात २० भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले. सुरुवातीला एका कमांडिंग ऑफिसरसह दोन जवान शहीद झाल्याचं वृत्त धडकलं होतं. पण त्याची पृष्टी लष्करानं केली नव्हती. रात्री उशिरा लष्कराने अधिकृत माहिती देताना या झटापटीत २० जवान शहीद झाले असून १७ जवान शहीद झाल्याचं स्पष्ट केलं होतं. जम्मू-काश्मीरमधील उरी आणि पुलवामानंतर एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक गमावण्याची ही तिसरी घटना आहे.