कॅप्टन दीपक साठेंना राज्य सरकार करणार मानाचा मुजरा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 11, 2020

कॅप्टन दीपक साठेंना राज्य सरकार करणार मानाचा मुजरा

https://ift.tt/33Md2K1
मुंबई: केरळमधील विमान अपघातात मृत्यू झालेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे वैमानिक दीपक वसंत साठे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साठे यांच्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं या संदर्भातील ट्वीट केलं आहे. ' यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीने पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी इतिहास रचला आहे. त्यांना मानाचा मुजरा आणि स्मृतींना विनम्र श्रद्धांजली,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. साठे यांचं पार्थिव रविवारी दुपारी विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दीपक साठे यांनी स्वत:चे कौशल्य पणाला लावत विमान स्वत:च्या बाजूने जमिनीकडे नेले. यामुळे शेकडो प्रवाशांचे जीव वाचले. यात त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. दरम्यान, त्यांचा मृतदेह रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आला. विमानतळावरील टर्मिनल २ मधील एअर इंडियाच्या कार्यालयासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर मृतदेह डॉ. भाभा रुग्णालयात हलविण्यात आला. त्यांच्या पत्नी सुषमा व दोनपैकी एक मुलगा यावेळी विमानतळावर उपस्थित होते. दीपक साठे यांना दोन मुले आहेत. यापैकी एक मुलगा अमेरिकेत असतो. त्याला अमेरिकेतून येण्यास विलंब होत आहे. यामुळे तो आल्यानंतरच मंगळवारी अंत्यसंस्कार होतील, असे एअर इंडियातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दीपक साठे यांचे कुटुंबीय मुंबईत चांदिवली भागात राहतात. तेथील स्मशानभूमीतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.