जयपूर: पत्नीशी किरकोळ भांडण झाल्यानंतर ती फोनवरच 'पागल' म्हणाली म्हणून २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जयपूरच्या श्यामनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगितले आहे. रवी कुमार असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पत्नीसोबत त्याचे किरकोळ भांडण झाले होते. फोनवर बोलताना ती त्याला 'पागल' म्हणाली. यामुळे त्यानं आत्महत्या केली. रवी हा घरकामगार होता. श्यामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले, की 'रवी कुमार हा मूळचा बिहारचा रहिवासी होता. तो जयपूरमध्ये काम करत होता. त्याचे कुटुंब हे मूळ गावी राहत आहे. मंगळवारी दुपारी त्याने खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.' पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी रवी कुमारने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने आत्महत्येचे कारण सांगितले होते. कुमार आणि त्याच्या पत्नीमध्ये फोनवर बोलताना किरकोळ वाद झाला होता. त्यादरम्यान पत्नी त्याला 'पागल' म्हणाली होती. 'माझे माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे. पण ती मला 'पागल' म्हणाली. त्यामुळे मला दुःख झाले आहे. मी माझे आयुष्य संपवत आहे,'असे त्याने पोस्टमध्ये नमूद केले. त्यानंतर केबलच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. सोशल मीडियावर त्याने पोस्ट लिहिली आहे. त्याचे कुटुंबीय बिहारहून येथे येतील. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. अन्य कोणत्या कारणामुळे तो त्रस्त होता का, याबाबत विचारणा करण्यात येईल. त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. त्याचा स्वॅब करोना चाचणीसाठी घेतला जाणार आहे. तसेच त्याचे कुटुंबीय जयपूरला आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.