करोनाची भीती गेल्याने हात धुण्याची सवय सुटली! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 9, 2020

करोनाची भीती गेल्याने हात धुण्याची सवय सुटली!

https://ift.tt/3lWEuKn
‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित वावराच्या निकषांसह हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे आरोग्यनियम उपयुक्त असले, तरीही प्रत्यक्षात हात धुण्याच्या सवयीचे पालन मुंबईकरांकडून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. वैयक्तिक सुरक्षेसह सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास कडक कारवाई केली जाते. शिस्तीचा बडगा उगारल्यामुळे मास्कचा वापर केला जातो. मात्र, हात धुणे, योग्यवेळी सॅनिटायझरचा वापर करण्याची सवय मोडली आहे, असे दिसून येते. करोना संसर्गाची शक्यता आता कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांची भीती कमी झाली आहे. मास्कचा वापर केला जातो, मात्र तो अधिक योग्य पद्धतीने करायला हवा. काही जण मास्क केवळ तोंडावर लावतात. नाकावर मास्क नसतो. त्यामुळे समोरून एखादी व्यक्ती शिंकली, खोकली तर त्यामाध्यमातून करोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मास्क लावण्याची योग्य पद्धतही महत्त्वाची आहे. याकडे संसर्गजन्य आजाराचे प्रमुख डॉ. यु. व्ही. मोरे यांनी लक्ष वेधले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सार्वजनिक ठिकाणी, दुकानांच्या बाहेर, तसेच गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझरची उपलब्धता ठेवायला हवी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. अनलॉकच्या प्रक्रियेमधील हा महत्त्वाचा निकष होता. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी हे निर्देश पायदळी तुडवण्यात येतात. करोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सांगितलेल्या सर्व निकषांचे पालन करायला हवे, असे त्यांनी सांगितले. मुलुंड, भांडुप, घाटकोपर, अंधेरी, गोरेगाव जोगेश्वरी येथील दुकानदारांनी आम्ही सॅनिटायझरच्या बाटल्या स्टॅन्डसह ठेवतो. मात्र, त्याचा वापर होत नसल्याचे सांगितले. तर काही बाटल्यांची अवस्था अतिशय खराब आहे. स्प्रे तुटले आहेत, तर कुठे स्टॅन्ड मोडकळीला आले आहे. त्यामुळे त्यांचा वापर केला जात नसल्याची तक्रार मुंबईकरांनी केली. काहींची अतिरिक्त खर्च करण्याची तयारी नसते किंवा सॅनिटायझरची उपलब्धता आहे का, याची तपासणी केली जात नसल्याचा अनुभवही आरोग्यकार्यकर्ते राहुल पवार यांनी सांगितला. 'मास्क जीवनशैलीचा भाग व्हावा' प्रत्यक्ष कोविडमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी मास्क हा आता जीवनशैलीचा एक प्रमुख भाग व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मास्कमुळे प्रदूषणापासून बचाव होतो. तसेच इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारापासूनही अटकाव होतो. त्यामुळे मास्क वापरणे हे सार्वजनिक, तसेच वैयक्तिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. श्वसनविकारांप्रमाणे अन्य आजारांचे प्रमाणही मास्कच्या वापरामुळे नियंत्रणात आल्याचे निरीक्षणही डॉक्टरांनी नोंदवले आहे. त्यामुळे करोनानंतरच्या काळामध्येही मास्कचा वापर करणे हे उपयोगी ठरेल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.