लष्करशाहीला वाढता विरोध; म्यानमारमध्ये फेसबुकवर बंदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 5, 2021

लष्करशाहीला वाढता विरोध; म्यानमारमध्ये फेसबुकवर बंदी

https://ift.tt/3jim6Mq
यंगून: म्यानमारमध्ये सत्ता ताब्यात घेतलेल्या लष्कराने सोशल मीडियावर निर्बंध आणले असून, ‘फेसबुक’ ब्लॉक करण्यात आले आहे. लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांच्या समर्थकांची जोरदार निदर्शने देशात सुरू असून, लष्करविरोधी आवाज दडपण्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. म्यानमारमध्ये ‘फेसबुक’ लोकप्रिय असून, या माध्यमातून तेथील सरकार विविध घोषणा करीत असते. बुधवारी रात्रीपासून फेसबुक ब्लॉक करण्यात आले असून, तेथील टेलिकॉम मंत्रालयाने इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना फेसबुक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील नागरिकांना एकमेकांशी संवाद साधण्याचे फेसबुक हे महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे फेसबुकवरील निर्बंध उठवून ते पुन्हा सुरू करावे, अशी मागणी फेसबुककडून करण्यात येणार आहे. वाचा: दरम्यान, लष्कराविरोधातील निदर्शने बुधवारी रात्रीही सुरू होती. कार हॉर्न वाजवून, सरकारविरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला. मोबाइलवरून एकमेकांना मेसेज करून सरकारविरोधात एकत्र येण्यासाठी आवाहन केले जात असून, आंग सान स्यू की यांच्या समर्थनाची पत्रके काही ठिकाणी वाटली गेली. वाचा: खासदारांची बैठक नवनिर्वाचित ७० खासदारांनी गुरुवारी लष्करी सरकारचा आदेश झुगारत संसदेची सांकेतिक बैठक बोलावली. देशात लष्कर नव्हे तर लोकप्रतिनिधीकडून निर्मिती झालेले कायदे सर्वोच्च असल्याचे त्यांनी सांगितले. काही खासदारांनी बैठकीत लष्करशाहीला विरोध करण्याची कटिबद्धता व्यक्त केली. ‘लष्करी बंडाविरोधात एकवटणार’ न्यूयॉर्क : ‘म्यानमारमध्ये लोकशाहीने आलेली सत्ता उलथवून लष्कराने केलेले बंड चुकीचे असून, या बंडाविरोधात आम्ही एकवटणार आहोत. आंतरराष्ट्रीय समुदाय त्यासाठी एकत्र येईल,’ असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी म्हटले आहे. म्यानमारमधील बंडाविरोधात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद अद्याप एकत्र आली नाही, हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. म्यानमारमधील सद्यस्थितीची चर्चा मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत झाली होती. मात्र, या बैठकीत कोणतीही ठोस बाब पुढे आली नसल्याचे गुटेरस यांचे म्हणणे आहे. ‘म्यानमारमध्ये स्थैर्य आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील,’ असे गुटेरस यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.