
नवी दिल्ली : आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शुक्रवारी चर्चा पूर्ण झाली होती. यासोबतच शेतकरी मुद्यावरही चर्चा झाली. आपल्या भाषणाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचं कौतुक करताना 'विरोधी पक्षांनीही राष्ट्रपतींचं भाषण ऐकलं असतं तर बरं झालं असतं... परंतु, तरीही राष्ट्रपतींचं अभिभाषण एवढं शक्तीशाली होतं की ते जनतेपर्यंत पोहचलं' असं म्हणत विरोधकांना टोला लगावला. अभिभाषण चर्चेत सहभागी झालेल्या ५० खासदारांचेही मोदींनी आभार मानले. 'वृद्ध आंदोलकांना घेऊन जा' राज्यसभेतील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चेचं आमंत्रण दिलंय. 'कृषीमंत्री सतत शेतकऱ्यांची चर्चा करत आहेत. आत्तापर्यंत कोणताही तणाव निर्माण झालेला नाही. एकमेकांचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलन करणे हा आपला हक्क आहे पण आंदोलनस्थळी बसलेल्या वृद्धांना तिथून घेऊन जा, अशी विनंती आम्ही आंदोलनकर्त्यांना करतो. आंदोलन मागे घ्या... पुढे वाटचाल करण्यासाठी एकत्र येऊन चर्चा करू. मी सदनाच्या माध्यमातून चर्चेचं आमंत्रण देतो', असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. 'आत्याबाई फुरंगटून बसल्या' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या एका वाक्याचाही उल्लेख केला. ज्यात सिंह यांनी मोठ्या बाजाराला प्रोत्साहन दिलं होतं. 'मजा म्हणजे, लोक उड्या मारत मारत राजकीय वक्तव्य करतात, त्यांच्या सरकारनंही आपल्या - आपल्या राज्यांत थोडं फार केलंच आहे. कुणीही कायद्याच्या हेतूवर शंका उपस्थित केलेली नाही. तक्रार ही होती की पद्धत योग्य नव्हती... खूप घाई केली. एखाद्या कुटुंबात लग्न असेल तर आत्याबाई फुरंगटून बसतात आणि म्हणतात, मला कुठे बोलावलं... तसंच हे आहे... इतकं मोठं कुटुंब आहे तर हे होतच राहणार' असा टोला पंतप्रधानांनी विरोधकांना लगावलाय.