नवी दिल्लीः अफगाणिस्तानमधून तालिबानच्या तावडीतून बाहेर आल्यावर नागरिक सुटकेचा निःश्वास सोडत आहेत. पण डोळ्यात भीतीही आहे. भारतीय मायदेशात आल्याने आनंदी आहेत. तर आपल्या देश उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून अफगाण नागरिकांना मात्र अश्रू अनावर झाले आहेत. गाझिबादमधील हवाई दलाच्या हिंडन तळावर भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर हे विमान उतरले. या विमानाद्वारे अफगाणिस्तानातून १६८ नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आलं. यातील १०७ भारतीय आहे. तर इतर अफगाणिस्तानातील शिख आणि हिंदू नागरिक आहेत. अफगाण शिख खासदाराला अश्रू अनावर अफगाणिस्तानमधील शिख खासदार नरेंदर सिंग खालसा यांना भारतात आल्यावर अश्रू अनावर झाले. अफगाणिस्तानात हिंदू आणि शिख बांधव चिंतेत आहेत. जेवढेही भारतीय आहेत, त्या सर्वांना लवकरात लवकर मायदेशात आणावं, अशी विनंती त्यांनी सरकारला केली. काबुल विमानतळाच्या प्रत्येक गेटवर ५ ते ६ हजार नागरिक उभे आहेत. त्यात तालिबानीही घुसले आहेत. यामुळे दहशतवादी कोण आणि नागरिक कोणचे कळत नाही, अशी भयावह स्थिती असल्याचं खालसा यांनी सांगितलं. गेल्या २० वर्षांत जे काही उभं केलं होतं ते सर्व संपलं, असं अश्रू अनावर झालेले खासदार नरेंदर सिंग खालसा म्हणाले. भारतात आलेल्या अफगाणच्या २४ शिख आणि हिंदुंपैकी खालसा हे एक आहेत. त्यांना भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर हे विमानाने भारतात आणण्यात आलं. यासर्वांची विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे. अफगाणिस्तानातून येणाऱ्यांना मोफत पोलिओ लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मला आता सुरक्षित वाटत आहे. आपली पत्नी भारतीय आहे. आम्हाला सुरक्षित आणल्याबद्दल भारत सरकारचे आभारी आहोत, असं एका अफगाण नागरिकाने सांगितलं. अफगाणिस्तानमधील परिस्थिती अतिशय खराब आहे. विमानतळावर आम्हाला २४ तास वाट बघावी लागली, असं वजूद शहजाद या अफगाण नागरिकाने सांगितलं. आमचे साथीदार गुरुद्वाऱ्यात अडकले आहेत. तिथे अडकलेल्या २८० जणांनाही मायदेशात आणावं, अशी आमची सरकारला विनंती आहे, असं मनजित सिंग म्हणाले.