पाणी तुंबण्यापासून माटुंग्याची सुटका? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 11, 2021

पाणी तुंबण्यापासून माटुंग्याची सुटका?

https://ift.tt/37xHYyh
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः माटुंगा पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानकात व स्थानक परिसरात तसेच धारावी भागात पावसाचे पाणी तुंबण्याच्या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. धारावीतील ९० फूट रस्त्यावर तब्बल १८०० मिमीची पर्जन्यजलवाहिनी टाकली जाणार आहे. पावसाचे पाणी या वाहिनीतून मिठी नदीत सोडले जाणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात पूर्व आणि पश्चिम माटुंगा रेल्वे स्थानक पाण्यात जाते. रेल्वेचे रूळ तसेच प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी येत असल्याने रेल्वेसेवा बंद ठेवावी लागते. धारावीच्या विविध भागांतही झोपडपट्ट्या आणि दुकानांमध्ये पाणी शिरते. परिणामी जनजीवन विस्कळीत होते. सरकारी यंत्रणा आणि नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. या पाणी तुंबण्याच्या समस्येवर उपाय म्हणून धारावीतील ९० फूट रस्त्यावर हिमालया हॉटेल ते संत रोहिदास चौक जंक्शनपर्यंत १८०० मिमी व्यासाची पर्जन्यजलवाहिनी टाकली जाणार आहे. मायक्रोटनेलिंग पद्धतीची ही पर्जन्यजलवाहिनी आहे. ही वाहिनी टाकण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. माटुंगा आणि धारावीत साचणारे पाणी या वाहिनीमार्गे मिठी नदीत सोडले जाणार आहे. या कामासाठी १२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पालिकेने हा नवीन पर्याय काढला असून, त्यामुळे दोन्ही परिसरांना दिलासा मिळू शकेल, अशी माहिती पालिकेच्या पर्जन्यजलवाहिन्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.