न्यूयॉर्कः दहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचं, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीला त्यांनी संबोधित केलं. दहशतवादाशी संबंधित आव्हानं आणि नुकसानीमुळे भारतावर खोलवर परिणाम झाला आहे. दहशतवादाला कोणत्याही धर्म, राष्ट्रीयत्व, सभ्यता किंवा वांशिक गटाशी जोडलं जाऊ नये. दहशतवादाच्या सर्व स्वरुपांचा निषेध केला पाहिजे. तो कोणत्याही प्रकारे न्याय्य असू शकत नाही, असं जयशंकर म्हणाले. काही देश आहेत जे दहशतवादाविरोधात लढण्याचा आपला सामूहिक संकल्प कमकुवत करत आहेत. त्यांना मुभा देता कामा नये. ISIS या दहशतवादी संघटनेने आर्थिक स्त्रोत अधिक मजबूत केले आहेत. हत्येचे बक्षीस आता बिटकॉइनच्या रूपात दिले जात आहे, असं जयशंकर म्हणाले. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर पहिल्यांदाच दहशतवादावर भारतानच्या चिंतेवर जयशंकर यांनी निवेदन दिले. अफगाणिस्तान असो की भारताविरोधात लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या संघटना आजूनही बेधडक होऊन दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत, असं म्हणत जयशंकर यांनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. कोविड प्रमाणेच दहशतवाद आहे. आपण सर्व सुरक्षित असल्याशिवाय कोणीही सुरक्षित नाही... (पण) काही देश आपला सामूहिक संकल्प कमकुवत करत आहेत, असं एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी २८ जुलैला मुआन अब्दुल गनी बरदार यांच्या नेतृत्वाखाली तालिबानच्या शिष्टमंडळाची तिआनजिनमध्ये भेट घेतली होती. हा गट दहशतवादाच्या समर्थनासाठी ओळखला जात होता. अफगाणिस्तान हा अफगाण जनतेचा आहे आणि त्यांचे भविष्य आपल्याच लोकांच्या हातात असावं, यी यांनी म्हटलं. अफगाणिस्तानातून अमेरिका आणि नाटो सैन्याने घाईने माघार घेणं हे खरं तर अफगाणिस्तानसंबंधी अमेरिकेच्या धोरणाच्या अपयशाचे प्रतीक आहे. अफगाणिस्तानच्या जनतेकडे आता राष्ट्रीय स्थिरता आणि विकास साध्य करण्याची महत्त्वाची संधी आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.