टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे, पण आगामी ऑलिम्पिक स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी मोठे आव्हान असणार आहे, असा इशारा भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रा यांनी दिला आहे. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धा ही टोकियो ऑलिम्पिकपेक्षा आव्हानात्मक असेल, असे बिंद्रा यांनी म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक अधिक क्लिष्ट २०२०मध्ये नियोजित टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोना महामारीमुळे एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली होती. २०२४मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी आता फक्त तीन वर्षाचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पात्रता स्पर्धा आणि कोटादेखील कमी केला जाईल. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली होती. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यानंतर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचं सुवर्ण पदक विजेत्या नेमबाजानं कौतुक केले. बिंद्रा म्हणाले की, ही एक ऐतिहासिक कामगिरी होती. आपण आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. या ऑलिम्पिकमध्ये अनेक अविस्मरणीय विजयी क्षण आणि हृदय पिळवटून टाकणारे पराभवही पाहायला मिळाले, पण हे सर्व खेळांमध्ये घडते. आपली लय तयार झाली आहे.'' ईएलएमएस स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. बिंद्रा पुढे म्हणाले की, “पुढील ऑलिम्पिकचं चक्र यापेक्षा क्लिष्ट असेल. कारण आता फक्त तीन वर्ष राहिले आहेत. सहसा खेळाडू ऑलिम्पिकनंतर वर्षभर विश्रांती घेतात, पण यावेळी त्यांना लगेच मैदानावर परतावे लागणार आहे. महाविद्यालयीन स्तरावर सुधारणा कराव्या लागतील अभिनव बिंद्रा म्हणाले की, वैज्ञानिक पद्धती आणि उच्च कार्यक्षमता सुधारण्याची सध्या गरज आहे. खेळाचं मूळ पक्कं करायचं असेल, तर देशभरात महाविद्यालयीन स्तरावर खेळाडूंसाठी काम करावं लागेल. त्यामुळे खेळाडूंचा खेळही आणखी सुधारता येईल. या स्तरावर कमतरता असल्याने कनिष्ठ खेळाडूंना आपली कामगिरी सुधारण्यात वेळ जातो. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतीयांना आपली योजना बनवावी लागेल.