नवी दिल्लीः हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपच्या इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ( ) चिंता वाढली आहे. त्यांच्या समोर भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला असण्याची शक्यता आहे. याला कारणही तसंच आहे. गेल्या तीन महिन्यात भाजपने गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री या तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत. यामुळे भाजप शासित इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही धाकधूक आपसूकच वाढली आहे. मुख्यमंत्री बदलाच्या घडामोडिंच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे अचानक दिल्लीत दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं होत. पण हा नियमित दौरा होता आणि मुख्यमंत्रीबदालाचा कुठलाही विचार नाही, असं भाजपला स्पष्ट केलं. मुख्यमंत्री बदलणं हा काँग्रेस हायकमांडच्या संस्कृतीचा हॉलमार्क राहिला आहे. पण आता २०२१ मध्ये भाजपनेही काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. भाजप राज्यांचं मुख्यमंत्री बदलत असल्याने ही घडामोड लक्षणीय आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील भव्य विजयानंतर भाजपने विविध राज्यांमध्ये प्रयोग केले होते. आता ते प्रयोग बंद करण्याची वेळ भाजपवर आल्याचं दिसतंय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अधिक जागा जिंकत बहुमत मिळवले. पण अनेक राज्यांमधील स्थिती मात्र बदलली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये कमी जागा मिळाल्याने भाजपला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र, झारखंडमधील सत्ता गेली आहे. तर हरयाणा कमी जागा मिळाल्याने युती करून सत्ता स्थापन करावी लागली. गुजरातमध्ये तर २०१७ च्या निवडणूक मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या नेतृत्वात भाजपने लढवली होती. त्यावेळी भाजपची धाकधूक वाढली होती. भाजपने ९९ जागा जिंकल्या. तर काँग्रेसचा ७७ जागांवर विजय झाला. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्यांमधील फारशी स्थिती भाजपसाठी फारशी चांगली राहिलेली नाही. यामुळे भाजप प्रयोगांना आता पूर्ण विराम देत जातीच्या आणि बेरजेच्या राजकारणाकडे वळताना दिसत आहे. गुजरातमध्ये पुढच्या वर्षा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पाटीदार समाजाच्या भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. गुजरातमध्ये बहुसंख्य असलेल्या पाटीदार समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये भाजपने आदिवासी समाजाचे नेते आणि बाबुलाल मरांडी यांना पुन्हा पक्षात घेतलं आहे. मरांडी हे भाजपचे विधानसभेचे नेते आहे. हरयाणामध्ये मनोहरलाल खट्टर अजून मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. पण शेतकऱ्यांची सततची आंदोलनं आणि आगामी विधानसभा निवडणूक पाहता खट्टर यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे. यामुळे त्यांची धडधड वाढली आहे.