
पाटणा : बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. बिहारच्या राजकारणातील प्रमुख नाव म्हणजे नितीशकुमार होय. नितीशकुमार सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत. सध्या त्यांनी त्यांचं राजकारण बिहारपुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. मात्र, दुसरीकडे नितीशकुमार यांचे निकटवर्तीय श्रवणकुमार यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठं वक्तव्य केलं. नितीशकुमार यांच्यामध्ये राष्ट्रपती होण्याचे सर्व गुण आहेत. जर त्यांना संधी मिळाली तर ते राष्ट्रपती होतील, असं त्यांनी म्हटलं आणि चर्चांना उधाण आलं होतं. बिहारच्या राजकारणात या संबंधी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. अखेर जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी यावर पडदा टाकला. ललन सिंह लखीसराय येथे पोहोचले तेव्हा पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी नितीशकुमार यांचं नाव जोडलं जातंय हे चुकीचं असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार बिहारच्या जनतेची सेवा करत आहेत. सध्या चर्चा सुरु असलेल्या गोष्टी खऱ्या नाहीत. नितीशकुमार यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार व्हायचं नाही किंवा त्यांना राष्ट्रपती देखील व्हायचं नाही, असं ललन सिंह म्हणाले. नितीश कुमार यांच्या संदर्भात उठललेले तर्क वितर्क थांबवण्याचा प्रयत्न करावा,असं सांगण्यात आलं आहे. नितीशकुमार यांनी त्यांच्या चेंबरमध्ये असताना अनौपचारिक गप्पा मारताना राज्यसभेत जाण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याचं म्हटलं होत, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा स्वत:चं त्या संदर्भातील चर्चा नाकारल्या होत्या. तरी देखील नितीशकुमार यांना राष्ट्रपतीपद किंवा उपराष्ट्रपतीपद मिळणर असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत. भाजप नितीशकुमार यांना राज्यसभेत पाठवून उपराष्ट्रपती बनवून बिहारचं नेतृत्व भाजपच्या नेत्यांकडे सोपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, अशा चर्चा आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नितीशकुमार यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी नितीशकुमार हे बिहारची सेवा करणार असून ते बिहार सोडून जाणार नसल्याचं म्हटलं आहे.