पर्यटकांसाठी गुड न्यूज! सातारा जिल्ह्यात साकारणार ‘नवे महाबळेश्वर’; या गावांचा असणार समावेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 22, 2022

पर्यटकांसाठी गुड न्यूज! सातारा जिल्ह्यात साकारणार ‘नवे महाबळेश्वर’; या गावांचा असणार समावेश

https://ift.tt/wcS6Ioh
@amar_shailaMT मुंबई : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर शेजारीच निर्माण करण्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. याबाबतचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले असून तीन वर्षांत आराखडा पूर्ण केला जाणार आहे. राज्यातील प्रमुख गिरीस्थानांमध्ये महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा, खंडाळा आदींचा समावेश होतो. महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते. येथील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातून या ठिकाणी येणारा ताण कमी करण्यासाठी नवीन गिरीस्थान विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यातून कोयना बॅक वॉटरच्या भागातील सुमारे ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी आणि सातारा या तीन तालुक्यांतील ५२ गावांमध्ये हे महाबळेश्वर निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. पाटण तालुक्यातील कराड चिपळूण रस्त्यापासून जावळी खोऱ्यातील कसबे बामनोली आणि सावरी गावापर्यंतच्या क्षेत्रात ते विस्तारलेले असेल. हा परिसर सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. या भागातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात. यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे. त्याचबरोबर घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देणगी लाभली आहे. परिणामी गिरीस्थान म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने तो परिपूर्ण आहे. सर्वेक्षण करणार राज्य सरकारने या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सन २०१९मध्ये नियुक्ती केली. याच वर्षी या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू होणार होते; मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे तीन वर्षे प्रकल्पाच्या कामाला थांबा मिळाला होता. आता पुन्हा त्याला वेग मिळण्याची चिन्हे आहेत. एमएसआरडीसीकडून महिनाभरात या क्षेत्राचा भूवापर नकाशा तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ड्रोन आणि जीआय सर्वेक्षणाच्या आधारे ते पूर्ण केले जाणार आहे. ‘महाबळेश्वरचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आराखडा मंजुरीसाठी पुढील तीन वर्षांचा कालावधी लागेल,’ अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार नवीन महाबळेश्वरच्या परिसरात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. ५२ गावांतील पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणे शोधून त्यांचा विकास केला जाईल. त्यातून पर्यटक आणि इतिहासप्रेमी या भागात आकर्षित होतील. पर्यटकांसाठी सोयीसुविधा आणि अस्तित्वातील रस्त्यांचे जाळे सुधारले जाणार आहे. रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन विकसित केले जाईल. यातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागातील जैवविविधतेचे संरक्षण करण्यात येणार आहे. तसेच हा विकास पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाला धक्का न लावता साधला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या गावांचा समावेश नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, जावळी तालुक्यातील अंधारी, कास, कसबे बामनोली, सावरी, पाटण तालुक्यातील गोशटवाडी, आंबेघर तर्फ, बागलवाडी, सावरघर, चाफोली आदी गावांचा समावेश असेल.