
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : देशातील महामार्गाचे जाळे भक्कम करण्यासाठी तब्ब्ल २५ लाख कोटी रुपयांचे रोखे आगामी काळात बाजारात येणार आहेत. यासाठी देश-विदेशातील वित्तीय संस्थांच्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार असला तरी मध्यमवर्गीय, नोकरदार, निवृत्त व लहान व्यापाऱ्यांनी रोख्यात केलेल्या गुंतवणुकीचा आठ टक्के परतावा मिळावा, या दिशेने केंद्राकडून नियोजन सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टच्यावतीने रोखे जारी करण्यात येत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड अर्थात इन्व्हिटच्या माध्यमातून भांडवली बाजारात उडी घेतली आहे. पहिल्या टप्प्यात जारी केलेल्या ३ हजार ८५० कोटी रुपयांच्या रोख्यांना पाच पट मागणी आली. अभूतपूर्व प्रतिसादामुळे पहिल्याच दिवशी विक्री बंद करावी लागली. त्यामुळे 'नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स'ची ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणारी नोंदणी आता उद्या, शुक्रवारी केली जाणार आहे. गेल्या काही वर्षात नागपूर, विदर्भ, महाराष्ट्रच नव्हे तर, देशाच्या कानाकोपऱ्यातील अतिदुर्गम भाग, डोंगराळ प्रदेशात महामार्ग, उड्डाणपूल आणि बोगदे केले जात आहेत. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून देशात महामार्गांचे जाळे भक्कम व्हावे आणि मध्यमवर्गीय सर्वसामान्यांनाही दोन पैसे कमवता यावे, असे प्रयत्न सुरू आहेत. देशातील पायाभूत सोयी व भविष्यातील रस्त्यांची गरज लक्षात घेता रोख्यांच्या माध्यमातून भविष्यात २५ लाख कोटी रुपयांचे निधी उभारण्याची योजना असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. वित्तीय संस्था आणि बड्या गुंतवणूकदारांखेरीज मध्यमवर्ग व सर्वसामान्यांनी रोखे घ्यावे, यावर त्यांनी भर दिला आहे. पहिल्या युतीच्या काळात नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना करून खासगी तत्त्वावर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे तयार केल्याची आजही चर्चा होते. मुंबईतील उड्डाणपूल आणि रस्त्यांनी राज्याच्या राजधानीचा चेहरा बदलला. आताही देशात सर्व प्रमुख शहरांना महामार्गांनी जोडणे, सागरमाला आणि पर्वतीय माला जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे. नागपूर-हैदराबाद साडेतीन तासांत मुंबई समृद्धी महामार्गाने जोडली जात असताना आता हैदराबादसाठी नवा महामार्ग येत आहे. सुमारे ३० हजार कोटी रुपये अपेक्षित खर्च राहणार असून यामुळे नागपूर ते हैदराबाद अंतर अवघ्या साडेतीन तासांत गाठता येणार आहे. आठ पदरी कॉरिडॉरचे अलायन्मेंट झाले आहे. हा मार्ग ॲक्सेस कंट्रोल राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यासोबतत नागपूर-विजयवाडा हा महामार्गदेखील प्रस्तावित आहे. २७ ग्रीनफिल्ड महामार्ग मुंबई-दिल्ली, नागपूर-हैदराबाद, पुणे-बंगळुरूसह देशात २७ नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग तयार करण्यात येत आहे. एक लाख कोटी रुपयांचा हा मार्ग असणार आहे. सर्व २७ महामार्ग ग्रीनफिल्ड असावे, यावर नितीन गडकरी यांनी भर दिला आहे. नगरहून जाणारा सूरत-चेन्नई महामार्ग ७५ हजार कोटी रुपयांचा राहील. सर्व महामार्ग २० हजार ते १ लाख कोटी रुपयांपर्यंत आहेत. त्यासाठी रोख्याद्वारे निधी उभारण्यात येणार आहे.