
ठाणे : आपल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्याने हजारोंच्या संख्येने आशा स्वयंसेविका महिलांनी भाऊबीजेच्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भाऊबीजेची ओवाळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केलेल्या कामाचा आणि हक्काचा मोबदला मिळत नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचं आशा स्वयंसेविका संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. राज्यात जवळपास ७० हजारहून अधिक आशा स्वयंसेविका तर ४ हजार गट प्रवर्तक कार्यरत आहेत. मात्र, या स्वयंसेविकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. अत्यंत कमी पगार आणि काम बेसुमार, अशीच काहीशी अवस्था या आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांची आहे. कर्तव्य अत्यंत चोख पद्धतीने बजावत असताना देखील किमान वेतन आणि बोनस पासून त्यांना वंचित राहावं लागलं आहे. कोरोना काळात देखील या सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आपले परिवार आणि संसाराची पर्वा न करता अत्यंत सचोटीने आणि मेहनतीने काम केले. ज्याची नोंद युनो सारख्या जागतिक स्तरावरील संस्थांनी देखील घेतली. परंतु, या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकां विषयी राज्य सरकार मात्र अत्यंत दुजाभाव करत असल्याचे चित्र दिसत आहे, असं महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि स्वयंसेविका संघ यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी या आशा स्वयंसेविकांनी अनेक वेळा आंदोलन केली आहेत. या विषयी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील याविषयी सकारात्मक भूमिका दाखवली होती. परंतु अद्याप या चर्चेनंतर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असं संघाकडून सांगण्यात आलं आहे. आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी द्यावी. अन्यथा भाऊबीजेच्या दिवशी या आशा स्वयंसेविकांनी हजारोंच्या संख्येने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या निवास्थानी जाऊन त्यांना भाऊबीजेची ओवाळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढे काम करून देखील हक्काचा मोबदला मिळत नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.