https://ift.tt/S5KREzV
मुंबई : महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती महाराष्ट्रासह देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महात्मा फुले यांचा जन्म गोविंदराव फुले आणि चिमणाबाई फुले या दाम्पत्याच्या पोटी ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. महाराष्ट्रासह देशभर सुरु असलेल्या कित्येक चळवळींची प्रेरणा म्हणून सर्व जण महात्मा फुले यांना अभिवादन करतात. स्त्री शिक्षणाद्वारे महात्मा फुले यांनी "स्त्रीशूद्रातिशूद्र म्हणजेच उपेक्षित समाजाला" ज्ञानाचा मार्ग खुला करुन दिला. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथांच्या माध्यमातून शेतीच्या आधुनिकीकरणाचा मार्ग महात्मा फुले यांनी मांडला. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहून महाराजांचा जातीपाती विरहित विचार गावोगावी नेला. महात्मा फुले यांनी सत्यावर विश्वास ठेवणारा समतामूलक समाज निर्माण करावा या उद्देशानं सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केली. समाज व्यवस्थेतील दोषांवर केवळ बोट न ठेवता कृतीशील पर्याय देखील देण्याचं काम त्यांनी दिलं. महात्मा फुले यांचा विवाह १८४० मध्ये सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. हा विवाह मोठ्या थाटामाटात झाल्याची नोंद आहे.
शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं
महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. शाळा सुरु केल्यानंतर काही अडचणी निर्माण झाल्या. सावित्रीबाई फुले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. जोतिबा फुले यांनी त्यांना काही दिवस घरीच शिकवलं. पुढे सावित्रीबाई फुले यांनी अहमदनगर येथे मिसेस फरार आणि पुणे येथे मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचं शिक्षण पूर्ण केलं. फातिमा शेख या देखील अध्यापनाचं काम करत होत्या. त्यांनी ज्ञानाची आणि विद्येची महती इथल्या समाजमनावर बिंबवण्याचं काम केलं. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वत्रिक आणि सक्तीचं करावी, अशी पहिली मागणी केली. हंटर कमिशनपुढं त्यांनी दिलेलं शिक्षणाबाबतचं निवेदन हा देखील महत्त्वाचा भाग आहे. स्त्री-शूद्रातिशूद्रांना शोषणातून बाहेर काढायचं असेल शिक्षणाचा प्रसार महत्त्वाचा आहे हे ओळखून महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्रात काम सुरु केलं. विद्येविना मति गेली | मतिविना नीति गेली || नीतिविना गति गेली | गतिविना वित्त गेले || वित्ताविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||या ओळींतून महात्मा फुले यांनी मनुष्याकडे शिक्षण नसेल तर काय अनर्थ होतात हे सांगितलं आहे.थोडे दिन तरी मद्य वर्ज करा | तोच पैसा भरा | ग्रंथासाठी ||ग्रंथ वाचताना मनी शोध करा | देऊं नका थारा | वैरभावा ||या ओळीतून व्यसनापासून दूर राहून म्हणजेच दारु सोडून देऊन त्यावर खर्च होणारा पैसा हा ग्रंथांसाठी म्हणजेच पुस्तकासाठी वापरण्याचा संदेश महात्मा फुले यांनी दिला आहे. ग्रंथ वाचताना तु्म्ही आत्मशोध घेण्याची गरज असल्याचं ते म्हणतात. तुमच्या मनात वैरभावाला थारा द्यायला नको, असा सल्ला देखील ते देतात.
स्त्री मुक्तीसाठी व्यापक कार्य
स्त्री शिक्षणाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर महात्मा फुले तेवढ्यावरच थांबले नव्हते. त्यांनी पुढे जाऊन विधवा विवाहांना प्राधान्य दिलं. १८५५ मध्ये महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला. ८ मार्च १८६० रोजी शेणवी जातीतील पुनर्विवाह त्यांनी गोखल्यांच्या बागेत घडवून आला. पुढे २५ जुलै १८५६ ला सरकारनं विधवा विवाहाचा कायदा केला. दुसरीकडे विधवांचं केशवपन करुन त्यांना विद्रूप केलं जाऊ नये या भावनेतून महात्मा फुले यांनी पुण्यात नाभिकांचा संप घडवून आणला. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना देखील त्यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार
महात्मा फुले यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर होता. कुळवाडी भूषण, शूद्रातिशुद्रांचा राजा, रयतेचा राजा असा गौरव ते महाराजांचा करतात. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी महात्मा फुले गेले होते. रायगडावर समाधीचा शोत त्यांनी घेतला. वाढलेली झाडं झुडपं तोडून टाकली. तिथं घडलेला प्रसंग देखील आज देखील चर्चेत असतो. तिथून परत आल्यावर महात्मा फुले यांनी शिवजयती महोत्सव मंडळाचा विचार मांडला. १९६७ मध्ये त्याला मूर्त स्वरुप आलं. महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी १८६८ मध्ये स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. पुढं जाऊन अस्पृश्यता विरोधी जाहीरनामा देखील मांडला.
सत्यशोधक समाजाची स्थापना
महात्मा फुले यांनी विविध भागात दौरे केल्यानंतर २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची पुण्यात स्थापना करण्यात आली. यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून ११ मे १८८८ रोजी मुंबईतील भायखळ्यातील मांडवी येथील कोळवाडी सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभागृहात त्यांना जनतेनं महात्मा ही पदवी प्रदान केली. महात्मा फुले यांनी तृतीयरत्न हे नाटक, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा, ब्राह्मणांचे कसब, इशारा, सत्सार १ आणि २ यासह विविध ग्रंथांचं लेखन केलं.