मुंबईः महाराष्ट्रात लव्ह जिहाद प्रकरणावरुन सध्या राजकारण रंगले आहे. भाजपने लव्ह जिहादवरून शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखाचा दाखला देत सोमय्यांनी शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग, असं म्हणत जोरदार टीका केली आहे. 'लव्ह जिहाद हा भाजपचा अजेंडा आहे. शेवटी लग्न करताना मुलगा आणि मुलीची संमती महत्त्वाची असते. मात्र, भाजप यावरुन केवळ राजकारण करु पाहते आहे,' अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती. त्यानंतर सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. '१० सप्टेंबरचा शिवसेनेचा सामना म्हणतो, लव्ह जिहाद देशासाठी घातक आहे. योगी आदित्यनाथ यांना आमचा पाठिंबा आहे. तर, २१ नोव्हेंबरचा सामना म्हणतो लव्ह जिहादमध्ये गैर काय आहे? यावरुनच शिवसेनेचा बदलता भगवा रंग दिसून येतोय,' अशी टीका सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, या आधीही यांनी महाराष्ट्रात लव जिहादचा कायदा आणणार असल्याचं म्हटलं होतं. 'उत्तरप्रदेशमध्ये लव जिहादविरोधात कायदा करण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ही कायदा लागू व्हावा यासाठी विधानपरिषदेत प्रस्ताव मांडू, अशी भूमिका सोमय्यांनी घेतली आहे.