मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु झालं, राज ठाकरे हळूच कानात कुजबुजले मग शिंदेंनीही 'राज की बात' सांगितली! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 22, 2022

मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु झालं, राज ठाकरे हळूच कानात कुजबुजले मग शिंदेंनीही 'राज की बात' सांगितली!

https://ift.tt/qoyhICc
मुंबई : मुख्यमंत्री यांचं भाषण सुरु होऊन केवळ दोन-तीन मिनिटेच झाली होती.... दिवाळीच्या शुभेच्छा देताना मनसेच्या दीपोत्सवाचं मुख्यमंत्री कौतुक करत होते. तेवढ्यात मनसे प्रमुख मुख्यमंत्र्यांच्या कानात कुजबुजले, मग मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणाचा नूर पालटला... पुढे मुख्यमंत्र्यांनी 'राज की बात' सांगत ठाकरेंना अपेक्षित विषयावर पुढची २ मिनिटे बॅटिंग केली... निमित्त ठरला मनसेचा दीपोत्सव सोहळा...! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्कवरील 'दीपोत्सव २०२२' सोहळ्याचं उदघाट्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. तुळशीच्या लग्नापर्यंत हा सोहळा असणार आहे. दीपोत्सव सोहळ्याचं हे १० वर्ष आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या थाटामाटात मनसेने या सोहळ्यांचं आयोजन केलंय आणि विशेष म्हणजे उद्घाटनालाही विशेष निमंत्रित पाहुणे बोलावले. राज्यातल्या सत्तांतरानंतर बदललेली राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेऊन राज ठाकरे यांनी फडणवीस-शिंदेंशी जुळवून घेतलंय. एवढंच नव्हे तिघा नेत्यांमधली केमिस्ट्री पाहिली तर पुढील काळात 'महायुतीचं नवनिर्माण' होण्याचीही शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायेत. हे झालं भविष्याचं पण गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांची फडणवीस आणि शिंदे यांच्याशी जवळीक वाढते आहे. राज ठाकरेही दोन्ही नेत्यांना वरचेवर पत्र लिहितायेत, सूचना करतायेत. बरं दोन्ही नेते राज यांच्या पत्रांना प्रतिसाद देतायत. आजही याचीच झलक पाहायला मिळाली. त्याचं झालं असं, दीपोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर राज ठाकरे, पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी शेवटी संबोधन केलं. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु होऊन जमतेम २-३ मिनिटे झाली होती. दीपावलीच्या शुभेच्छा, मनसेचा दीपोत्सव... अशा विषयांवर मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री 'त्याच त्याच' विषयावर रेंगाळत असल्याचं पाहून राज ठाकरे हळूच मुख्यमंत्र्यांच्या कानात कुजबुजले. पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात बोला, असं राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना म्हणाले. मुख्यमंत्र्यांनीही भाषणाचा नूर पालटला.. राज ठाकरेंनी कानात सांगितलेल्या निरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढच्या काही सेकंदात शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात सूतोवाच केलं. हे सरकार सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं तसंच शेतकऱ्यांचं आहे. राज ठाकरे सूचना करतायेत, आपणही शेतकऱ्यांना मदत करतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा पाढा वाचला.